‘आज पाडव्याच्या दिवशी ब्लॉग सुरू केला’ अशी दोन वर्षापूर्वीची नोंद, त्यानंतर आठवडय़ाभराने ब्लॉगवर एखादी कविता किंवा फॉरवर्ड-ईमेलवरून चिकटवलेला मजकूर आणि मग काहीच नाही. असेही नाममात्र ब्लॉगर आहेत. ब्लॉगची गुढी उभारून झाली, एवढय़ा एका समाधानाखेरीज त्यांना काहीच मिळालं नसेल त्यांच्या ब्लॉगमधून. पण बाकीचे किमान तीन-चारशे रेग्युलर ब्लॉगर (हौशी मराठी लेखक) आहेत, ही आपल्या समाधानाची गोष्ट. काही नाही तरी, ‘गुढीपाडव्याच्या शुभेच्छा’येत्या सोमवारीही अनेक मराठी ब्लॉगांवर पाहायला मिळतील. म्हणजे चैत्र-पाडव्याला गूळकडुनिंब खाणे, गुढी उभारणे या उपचारांत पाचेक वर्षापूर्वी जशी ‘शोभायात्रां’ची भर पडली, तशी आता ब्लॉग-नोंदींचीही भर पडते आहे.
गुढीपाडव्याला केलेल्या वा या सणाबद्दलच्या ब्लॉग-नोंदींमधून लेखकांचं काही चिंतन दिसतं का, शुभेच्छांच्या पलीकडे या सणाबद्दल काही बोलता येतं का, यादृष्टीनं शोध घेतला तर मात्र अगदी मोजके ब्लॉग हाती येतात. वयानं पन्नाशीपार गेलेल्या दोघा ज्येष्ठांनी आपापल्या ब्लॉगवर निरनिराळ्या वेळी केलेल्या नोंदी ‘चिंतन’ म्हणावं, अशा आहेत. काळाला स्वीकारण्याची हतबलता आणि तयारी या दोन टोकांच्या मधला जो टापू असतो, तिथं कुठंतरी राधिका रेडकर (http://radhikaredkar.blogspot.com/2007/03/blog-post_19.html) आहेत. त्यांनी आपल्या लहानपणीच्या पाडव्याचं वर्णन करून, अखेरच्या परिच्छेदात लिहिलंय-
आज ’तो’ पाडवा आठवून वाईट वाटतंय का असं मी (डोळे मिटूनच ) मनाला विचारलं. मनाने हलकेच नकारर्थी मान हलवली. ते हसून म्हणालं, ‘वाईट काय वाटायचं त्यात? प्रत्येक वेळचे नियम वेगळे, प्रत्येक वेळच्या गमती वेगळ्या. तुला लवकर उठून आवरण्यात मजा वाटतेय ना, मग आवर. मस्त पैकी चहा घे कपात ओतून, बस अंगणातल्या पायरीवर. मी आहे तुझ्या सोबत. चहा थोडा जास्त कर मात्र, कारण रोजच्या धकाधकीत दमलेल घर होईलच जागं चहाच्या वासाने. आणि जमतीलच सगळे तुझ्या भोवती आपापले कप भरून. त्यांच्या संगतीत आनंदाची कारंजी उडताना बघणं हे गुढी उभारण्यापेक्षा वेगळं थोडंच आहे?’ मग ’ती’ गुढी उभारायला थोडा वेळ लागला तर बिघडलं कुठे?
पांडुरंग खांडेपारकर (http://pskhandeparkar.blogspot.com/2011/03/blog-post_1008.html) हेही ज्येष्ठ नागरिक. त्यांनी गुढीपाडव्याच्या आठवणी छानच काढल्या आहेत, पण अभावितपणे या ‘सणासुदी’ची चिकित्साही केली आहे. अगदी लहानपणीच्याच निरागस क्षमतांनिशी.
मराठी भाषेत लिहिणा-यांकडे वास्तवाला भिडण्याची तयारी असते, असं हे लिखाण वाचताना वाटतं. तरुण ब्लॉगरांच्या काही नोंदींमधून तर ही तयारी अधिकच प्रकर्षानं - ड्रास्टिकली या अर्थानं- दिसते. मध्यंतरी एका कट्टर संघटनेनं गुढीपाडव्याला समर्थन आणि एकतीस डिसेंबर- एक जानेवारीच्या नववर्ष सदिच्छांनाही विरोध, असा पवित्रा घेतला होता. सुमारे 25 ब्लॉगरांनी हे आवाहन जसंच्यातसं आपापल्या ब्लॉगवर चिकटवलं, ते कोणत्या हेतूनं, याचे खुलासे उपलब्ध नाहीत.‘‘आज बरंच काही खरडायची इच्छा आहे पण पेशन्स नाही. इथेच थांबतो. दारूपाटर्य़ा वाईट, गुढीपाडव्यालाच नववर्ष वगरे म्हणून खट्ट असलेल्या मंडळींनाही शुभेच्छा आहेत बरं का. इथं एक सुविचार बळंच फेकावासा वाटतो. ‘‘केवळ तुम्हाला जगाबद्दल इश्शूज आहेत म्हणून जगालाही तुमच्याबद्दल इश्शूज असतीलच असं काही नाही/’’ अशी नोंद ‘मुक्ताफळे’वर अवघ्या तीन महिन्यांपूर्वी- 2011 उजाडताना नॅकोबांनी केली आहे. (http://www.muktafale.com/post)
महाराष्ट्राच्या ज्या-ज्या शहरांत संगणकसाक्षरता आधी पसरली, त्या-त्या शहरांत गुढीपाडव्याच्या ‘शोभायात्रा’देखील आधी निघू लागल्या, असा एक योगायोग आहे. पण या समूह-फे-यांचं वर्णन फार कुठल्या ब्लॉगवर नाही. एकविसाव्या शतकातल्या एका ब्लॉगरनं टीव्हीवर डोंबिवली, ठाणे, गिरगाव इथल्या शोभायात्रा पाहून त्यांचं वर्णन ब्लॉगवर केलंय! पण ‘मी स्कूटरवर होते, अमुक रंगाची साडी नेसले होते. माझा फोटोसुद्धा अमुक अमुक पेपरात आला’ वगैरे लिहिणारी एखादी ब्लॉगरभगिनी भेटेल इथं, अशी अपेक्षा फोल ठरली. ‘बंधूं’कडून ती अपेक्षा फारशी नव्हतीच. हे झालं मुंबईचं, तर अमेरिकेतल्या घरात गुढीपाडव्यानिमित्त केलेल्या जेवणाच्या बेताचा उल्लेख एकदोघा ब्लॉगरांनी केला आहे, तोही अन्य कुणी केलेला दिसला नाही.
हौशी लेखक नसलेल्या आणि व्यवसाय किंवा राजकीय विचाराशी संबंधितच ब्लॉगलेखन करणा-या लोकांची संख्या वाढते आहे. गेल्या वर्षभरात (म्हणजे अगदी आर्थिक वर्षात किंवा चैत्र ते फाल्गुन धरलं तरी) मराठी पत्रकारांपैकी साठ-सत्तरजण नव्यानं ब्लॉगजगतात (लिहिलं तिकडं की चिकटव इकडं- या पद्धतीनं) वावरत आहेत. कुंडली मांडणं किंवा ज्योतिष या व्यवसायात असलेले कितीजण असा व्यवसायाधारित ब्लॉग चालवतात माहीत नाही, पण क्रिकेटबिकेटवर लिहीत नसतात तेव्हा ‘धोंडोपंत उवाच’ या नावाच्या ब्लॉगवर अनेकदा कुंडली, आकडेमोड आदींबद्दल वाचायला मिळतं. या धोंडोपंतांचे व्यवसायबंधू राजीव उपाध्ये. (http://rajeev-upadhye.blogspot.com/2011/03/blog-post_15.html) त्यांनी अगदी गेल्या दहाच दिवसांत केलेली एक नोंद ‘भारी’ या सदरात मोडणारी आहे. भारतीयांच्या मुहूर्तासंबंधी काही चमत्कारिक कल्पना आहेत. त्या ठाम विश्वासाने ते पाळतात. गुढीपाडवा, दसरा कोणत्याही ग्रहयोगात सापडला असला तरी ते त्याला ‘शुभ’च मानतात. कोणत्याही पंचांगकर्त्यां ज्योतिर्विंदाने याची दखल घेतलेली मला तरी आठवत नाही. अशी सुरुवात करून उपाध्ये यांच्या ब्लॉग-नोंदीत चार एप्रिलला असणा-या ग्रह-स्थिती- बद्दल तपशीलवार वर्णन केलं आहे.
सणाच्या शुभेच्छा एकमेकांना देण्याचे मार्ग मोबाइलपासून ब्लॉगपर्यंत पसरलेले असताना, एका ‘राजकीय (संभाजीभक्त) ब्लॉगर’नं अनेक मराठीजन ज्या विश्वासानं गुढीपाडवा साजरा करतात, त्या विश्वासांच्या मुळावरच घाव घालण्याचा प्रयत्न (छत्रपतीभक्तीतून) केला आहे. (http://bsambhaji.blogspot.com/2011/03/blog-post.html) हा शोचनीय- म्हणजेच ज्यावर विचार करावा असा- उल्लेख मुळात असा आहे : गुढीपाडवा का साजरा करतो? हा सन आपण? कारण आम्हाला आमचे आई वडील सांगतात कि हा हिंदूंचा नव वर्षदिन आहे. त्याचबरोबर याच दिवशी राम-रावणाचा वध करून अयोध्येत आले होते . त्यामुळे सर्वानी आनंदाने गुढय़ा उभारल्या त्याची आठवण म्हणून आजही आपण गुढय़ा उभारतो. ही माहितीही आई-वडिलांना ब्राम्हणाने सांगितली असते ते आपणास सांगत असतात यात खरे किती खोटे किती याचा शोध घ्यायचा नसतो.
त्यातल्या त्यात देवधर्माची बाब असेल तर विचार करणे सुद्धा पाप.
राम अयोध्येत परत आले म्हणून सर्वानी (किमान हिंदूंनी) गुढय़ा उभा करावयास पाहिजे. अयोध्येत गुढय़ा उभा करतात का? अरे,अयोध्येतील लोकांना गुढय़ा म्हणजे काय हे सुधा माहित नाही तर उभा करण्याचा प्रश्नाच येत नाही. िहदू धर्मात तांब्या शुभ कोणता? तर सवासा-सरळ . त्यात नागवेलीचे पाने लावली आहेत. श्रीफळ वर ठेवले आहे . चारी बाजुने पाच गंधाचे पट्टे ओढले आहेत. या धर्माला सवासा तांब्या शुभ तर गुढी पाडव्याला नववर्षी आपल्या घरावर गुढीला पालथा तांब्या ही शुभ कसा? या धर्मात पालथे सर्व अशुभ तर याच दिवशी हा पालथा तांब्या ही शुभ कसा?
शिवाजी महाराजांनी व त्याकाळात गुडी उभारल्याचा कुठे उल्लेख येत नाही! ते कसे? कुठे तरी तसा उल्लेख हवा होता कि..शिवशक बंद होऊन पुन्हा महाराष्ट्रात शालिवाहन शक कसा सुरू झाला?
छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यारोहानानंतर स्वताच्या नावाचा शक सुरू केला. मग आता आपण याच शकाने चैत्र शु एक ऐवजी जेष्ठ शु 13ला गुढी उभारणे व नवीन वर्ष साजरे करणे अधिक योग्य नाही का ?त्यामुळे मराठी माणसांनी खर तर आता गुढी पाडव्याला शालिवाहन शकाप्रमाणे गुढी पाडव्याला नाव वर्ष साजरे नकरता शिवशकाप्रमाने नवीन वर्ष जेष्ठ शुद्ध 13 ला साजरे करावे, या दिवशी गुढी उभारावी तोरणे लावावीत.
याहीपुढे बराच मजकूर आहे आणि तो सामाजिक अभिसरणाला बाधा आणणारा, मुद्दे मांडण्याच्या सुराऐवजी आरोप करण्याच्या सुरातला ठरेल, हे उघड आहे. पण शिवराय-भक्त म्हणवणा-यांनी शिव-शकाला मराठी नववर्ष मानण्याऐवजी गुढीपाडव्यालाच ‘मराठी नववर्ष’ का मानावं, हा सवाल मात्र अनेकांना पेचात पाडणारा ठरेल. हा ब्लॉग काहीसा प्रचारकी असला तरी त्यातूनही वाचकाला चिंतन-मंथनाकडे जाता येऊ शकतं.
असो, गुढीपाडव्याला बँक हॉलिडे असतो आणि तो सर्वाचा सण आहे हे ठरलेलं आहे. तेव्हा युगादीच्या, चेटीचांदच्या,चैत्रप्रतिपदेपासून सुरू होणा-या नव्या शालिवाहन शकाच्या आणि गुढीपाडव्याच्याही शुभेच्छाच.. नॅकोबा, तुम्हालाही जाहीर शुभेच्छा!
मी गुढीपाडव्याला गुढी उभारण्याच्या प्रथेबद्दल माझ्या ’आज सुचलेलं’ या ब्लॉगवर (www.thoughtfortuday.blogspot.com) लिहिलेले आपल्या वाचनात आलेले दिसत नाही. जरूर वाचावे. राज्याभिषेक शक शिवाजीमहाराजांच्या मृत्यूनंतर बंदच झाला. तेव्हांच्या मराठी सत्ताधार्यांनाहि त्याची मातब्बरी वाटली नाही याचे नवल वाटते.
ReplyDeleteआपली समीक्षा मात्र नेटकी आहे! अभिनंदन
ReplyDelete