उन्हाळ्याच्या चाहुलीपासून वळवापर्यंतच्या या नोंदींमधून एक लक्षात येतं की,
उन्हाळय़ाबद्दल, त्रासाबद्दल काहीच बोललं गेलेलं नाही ...
पावसाबद्दल, सुखाबद्दल खूप उत्साहानं सांगितलं गेलंय!
‘‘आज अचानक पुण्याची दरारून आठवण येतेय. सध्या उन्हाळा सुरु झाला असेल..सगळी लोक या वर्षीचा उन्हाळा किती जास्त आहे मागच्या उन्हाळ्या पेक्षा हे, डिस्कस करत असणार.’’ हे वाक्य, अर्थातच मूळ पुण्याच्या आणि आता तिथं नसलेल्या व्यक्तीचं.. ही प्राची.. ‘खाऊघर’ नावाचा ब्लॉग लिहिणारी, पेशानं एव्हिऑनिक्स इंजिनीअर आणि ब्रिटनमधल्या ब्रिस्टलला राहणारी. तिच्या याच ब्लॉग-नोंदीत शेवटी-शेवटी एक वाक्य आहे, ‘‘इंग्लंड मध्ये राहिल्यावर सर्वात पहिली गोष्ट जिचं महत्व पटतं, ती म्हणजे उन - सध्या इकडेही हळूहळू उन्हाळा सुरू होतोय. उन्ह पहिलं की कोण आनंद होतो.. आणि इकडे पावसाचा मस्त आवाज येत नाही..’’
प्राचीची ही नोंद ‘खाऊघर’मधल्या बाकीच्या- प्रामुख्यानं रेसिपींपेक्षा निराळी आहे. तशी वेगळी नोंद करण्याचं कारण, ‘दरारून’किंवा उन्हाळ्यात येणा-या घामासारखी दरदरून आलेली आठवण! उन्हाळा इथं नाही आणि तिथं असणार, ही जाणीव..
पण समजा तुम्ही इथंच आहात, तर असेल का तुम्हाला उन्हाळ्याचं कौतुक?
‘‘माझ्याकडे मिरच्या सुकवायला जागा आहे आणि वाशीचे एपिएम्सी मार्केट घराजवळ आहे त्यामुळे दरवर्षी मसाला माझ्याकडेच बनवला जातो. ज्याने त्याने जेवढा हवा तेवढा आधीच सांगायचा. मग एके शुक्रवारी संध्याकाळची आई अवतरते माझ्या घरी. बोरिवली ते बेलापूर येणे हे तिच्यासाठी जगाच्या या टोकापासून ते त्या टोकापर्यंत जाण्यासारखे आहे. मग रात्री उशिरापर्यंत उद्या काय काय घ्यायचे त्याची यादी बनते. शनिवारी सक्काळीच उठून आमची वरात एपिएम्सीच्या मार्केटात.
दोनेक तास लागून सगळी खरेदी.. मग दुपारी घरी आल्यावर आईची अगदी घाई उडते. लगोलग मिरच्या वाळत टाकणार.
‘अगं, कर आरामात. कशाला घाई करतेस?’
‘आता मसाला होईपर्यंत मी काही आराम करत नाही बघ. आणि जरा उन दाखवले की मिरच्यांचा कुटाणा पडत नाही गं.’
हे सगळं उन्हाळ्यातच होतंय, उन्हाळय़ातच लिहिलं जातंय..
‘‘नेमेचि येतो मग उन्हाळा.. आणि सोबत मसाला’’ अशा छान शीर्षकाची ही नोंद लिहिलीय साधना यांनी, गेल्या वर्षी.
इथं, या नोंदीत आठवण कसली आहे?
उन्हाळ्याची नाही, मसाल्याचीही नाही.. आईची आठवण!
श्रावणातच जणू माहेरची आठवण होते, असा प्रघात स्त्रीगीतांनी पाडून ठेवलेला आहे, त्यापेक्षा हे ब्लॉगवरलं किती वेगळं आहे, इथं आईच्या आठवणीचा ब्लॉग तिच्याशी फोनवरल्या गप्पांपासूनच सुरू होतो आणि मालवणी मसाल्याच्या रेसिपीपाशी संपतो!
उन्हाळ्याचं नातं गृहिणीपणाशी नक्की आहे, असं या ब्लॉग-नोंदीवरून जाणवू लागतं.. पन्हं, मसाले, पापड- कुरडया, यांच्या आठवणी उन्हाळय़ाबद्दलच्या अनेक ब्लॉग-नोंदींनी काढल्या आहेत. पण उन्हाळ्याबद्दल ‘दरारून’ किंवा भरभरून बोलणा-या नोंदी जरा कमीच आहेत. या उपलब्ध नोंदींचा सूर आठवणवजाच आहे! उन्हाळय़ात पाहुणे यायचे, कौटुंबिक बोलणं व्हायचं,तेव्हाचं एकेकाचं बोलणंसुद्धा या ब्लॉग-नोंदींसारखंच असेल, असंही वाटू लागतं!
प्राची यांच्यासारखी दुसरी दूरदेशीची माहेरवाशीण कांचन. त्यांनी मिशिगनच्या उन्हाळ्याबद्दल लिहिताना एवढास्सा इथला उन्हाळा लोक कसा साजरा करतात, जागोजागी ‘समर मार्केट’ भरतात, याचा उल्लेख केला आहे आणि ‘एवढे लोक बघूनच बरं वाटतं’ असा सूरही लावलाय. भारतात नसलेले एक ‘भारद्वाज’ म्हणून आहेत, त्यांनी काही धनिक अमेरिकनांची ‘समर हाउसेस’ असतात, अशी नोंद केली आहे. पण उन्हाळा हा या नोंदींचा मुख्य विषय नाही!
एक अपवाद आहे.. पुण्याची एक तरुण आणि नवीनच ब्लॉगर आहे सायली चौधरी. ‘सहज कधीतरी’ हे तिच्या ब्लॉगचं नाव योग्यच वाटेल, असं ती लिहिते. शब्दयोजना चपखल, पण वाक्यरचना मात्र अनघड , ओबडधोबडही! अभ्यासू मुलींमध्ये दिसणारं समंजसपणा आणि अल्लडपणाचं मिश्रण तिच्या लिखाणात आहे. ती लिहिताना कुठलीही पोज न घेणारी ब्लॉगर आहे. प्रसंगी ती स्वत:वरही विनोद करू शकते, म्हणूनच बहुधा ती कवितापंथाला न लागता गद्यलिखाण करू लागली! अनाग्रही गद्यातला संज्ञाप्रवाह ती छान सांभाळते..
‘कितीतरी गोष्टी .. उन्हाळ्याच्या..!!’ या शीर्षकाच्या नोंदीत तिनं लिहिलंय.. ‘‘पुण्याचा उन्हाळा म्हणजे रखरखीत ऊन अन् दुपारी गरम झळा पण संध्याकाळ होताच मंद थंड वारा.!’’, ‘‘डोक्यावर स्कार्फ, नखशिखांत त्वचा सूर्यापासून वाचवणा-या मुली. सनकोट, ग्लोव्हजची खरेदी करणा-या असंख्य बायका..’’ पण सायलीलाही आवडतो तो पावसाळाच.. पुण्याला गेल्याच आठवडय़ात वळवाचा पाऊस झाला, तेव्हा सायलीनं ‘नजरेला भावते ते सर्व काही..’ अशा नोंदीत हे लिहिलं :
‘‘पहिल्या पावसानंतर सांज खुलते अगदी तसेच रंग काल आकाशाने धरले होते. आज ऑफिसमधे असताना सरी यायला सुरुवात झाली. आंब्यांसाठी हळहळ पण तरीही थंडाव्याने आम्ही सुखावलो होतो. साडेसहाला सुटले तशी गाडी जोरात हाकत घरी आले आणि तडक गच्चीत गेले. पुण्यात सहकारनगरला जरा डोंगरावरच घर असल्याने गच्चीतून जवळजवळ निम्मं पुणं दिसतं. पाऊस सुरू झाला तसं टप्प्याटप्प्याने भिजणा-या पुण्याला बघताना मनोमन मी पण भिजत होते. अशा वेळी लाईट गेले तर ढगांचे गुलाबी केशरी रंग आणि मधेच कडाडणा-या विजेच्या लखलखाटात कितपत दूर शहर दिसतंय हे बघायचा पोरकट प्रयत्न होतो.’’
वळीव ही चीजच अशी आहे की, ‘मी तो अनुभवला’ हे सांगण्याचा मोह कुणालाही होतोच. चिंचवडच्या सागर बोरकरनं यंदाच्या वळवात सिक्सरच मारलाय- सहा-सात प्रकारचे फोटोच टाकलेत सरळ ब्लॉगवर. ‘‘नुकताच अर्ध्या तासापूर्वी आमचे येथे चिंचवडला वळवाचा जोरदार पाउस झाला. हा या मौसमातला पहिलाच पाउस आणि तोही गारांसह. तेव्हा यानिमित्ये जमेल तशी काही छायाचित्रे घेण्याचा मोह आवरला नाही’’ असं सागर लिहितो.
वळवानंतर जो मृद्गंध येतो, त्याबद्दलची एक खूप खरी कॉमेंट ब्लॉग-जगतातच सापडली होती एकदा. मूळ नोंद बहुतेक,आवडते वास अशी काहीतरी होती. तर कुणा सागरनं (हा सागर बोरकर नसेल) कॉमेंटमध्ये लिहिलंय :
‘‘कालचीच गोष्ट.. वळीव पडला..
मला आजकाल वाटायचं ‘मृद्गंध’ हा शब्द खूप क्लीशे झालाय.. सगळेच वापरतात कुठेही, कसाही.. पण काल आला तो. मातीचा मंद वास.. क्लीशे ब्लीशे गेले उडत.. मातीचा वास तो मातीचा वासच !!’’
हा सागर ब्लॉगर आहे की नाही, माहीत नाही. पण त्याची भाषा, त्यामागची तरुण तडफ मुद्दाम पुन्हा वाचून पाहा. हा सागर लिहीत असेल, तर कधीतरी सापडेलच ब्लॉगजगतात.
उन्हाळ्याच्या चाहुलीपासून वळवापर्यंतच्या या नोंदींमधून एक लक्षात येतं की, उन्हाळय़ाबद्दल, त्रासाबद्दल काहीच बोललं गेलेलं नाही. पावसाबद्दल, सुखाबद्दल खूप उत्साहानं सांगितलं गेलंय!
लिखाणाचा खरा ऋतू पावसाळाच बहुधा. आनंद हीच महत्त्वाची अनुभूती, आणि सांगण्याजोग्या अनुभूतीखेरीज लिहायचं नाही, अशा धारणेमुळे पावसाळ्याबद्दलच लिखाण जास्त होत असावं. उन्हाळा आठवणीपुरता बरा.. पण अनुभव हवा पावसाचाच!
No comments:
Post a Comment