आंबा पिढय़ानपिढय़ा खाणारा जो सामाजिक स्तर होता तोच निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी ब्लॉग लिहिण्यातही आता अग्रेसर आहे. जातींचं अस्तित्वच मोडून-तोडून काढण्याची, विद्रोहाची गरज या वर्गाला वाटत नसल्यामुळे असेल, पण आपण जात मानत नसलो तरीही जातींचं अस्तित्व मान्य करण्याकडे या वर्गाचा कल आहे....
‘‘आजकाल हा कोकणचा राजा झिम्मा खेळायचे सोडून लपंडाव आणि खोखो (मद्रासी भावाबरोबर) हेच खेळ जास्त खेळायला लागला आहे. मी भारतात परतून चार वर्षं झाली, पण दर वर्षी‘यंदा आंबा कमी’ हेच पेपरात वाचतोय.’’ अशी खुमासदार सुरुवात करून हापूस आंब्यावर अख्खी ब्लॉग-नोंद पुणेकर (मुक्काम वाकड) निरंजन क-हाडे यांनी लिहिलीय! (http://sukameva.wordpress.com/2010/05/17) बाकीच्यांनीही आठवणी काढल्यात हापूसच्या, पण ही क-हाडेंची नोंद मुळातून वाचण्यासारखी आहे. बाकीच्या नोंदी वाचताना त्यात आत्मगत जास्त असतं. सद्यस्थिती लोकांना सांगताना आपण लोकांपेक्षा निराळं लिहिलं पाहिजे, असा विचार ब्लॉगला ‘स्वान्तसुखाय’ मानल्यास केला जात नाही. क-हाडे मात्र सहसा,वाचनीयतेचा विचार करतात असं दिसतं.
पण म्हणून आत्मपर आणि स्वान्तसुखाच्या नोंदी वाचनीयच नाहीत, असंही नाही.. हापूसबद्दल तर, अशा नोंदीच महत्त्वाच्या ठरतात कारण त्या ‘एका फळाबद्दलच्या सामाजिक आठवणींचा दस्तऐवज’ ठरतात. आंबा पिढय़ानपिढय़ा खाणारा जो सामाजिक स्तर होता तोच निव्वळ स्वत:च्या आनंदासाठी ब्लॉग लिहिण्यातही आता अग्रेसर आहे. जातींचं अस्तित्वच मोडून-तोडून काढण्याची, विद्रोहाची गरज या वर्गाला वाटत नसल्यामुळे असेल, पण आपण जात मानत नसलो तरीही जातींचं अस्तित्व मान्य करण्याकडे या वर्गाचा कल आहे. काही ब्लॉग-नोंदी खूप जवळिकीनं वाचताना हे आत्मपरीक्षण याच वर्गातल्या वाचकांनाही करता येईल. उदाहरण म्हणून ‘सगळे आंबे काही एका घराण्यातले नसायचे. कोणी देवगडचा, कोणी रत्नागिरीचा. आणि घराणे जसे वेगळे तसे घराण्यात परत जाती, कोणी हापूस, कोणी पायरी, कोणी तोतापुरी आणि पारंपरिक जातीय पद्धती प्रमाणे आंब्याला मानाची वागणूक मिळत असे. हापूसची स्वारी मानाप्रमाणे छान पेटी मध्ये वगरे असायची. या उलट तोतापुरीच्या वाट्याला कोपरयातील टोपली!’ हे शब्द नीट वाचून पहा. पुण्याच्या अभिजीतनं मनापासून आणि अगदी संवादीपणे लिहिलेली अख्खी नोंदही वाचा. जातीची उच्च-नीचता आणि जातीची उपयुक्तता यांचा थेट संबंध सध्या हापूसमध्ये जोडता येतोय, असं तरी वाटेलच ! (http://abhya.blogspot.com/2010_05_02_archive.html)
ब्लॉगवर मराठीत लिहिणा-यांच्याही जाती-पंथ लिखाणानुसार आहेतच.. इथं कविता करणारे फारच स्वान्तसुखाय लिखाणवाले असतात आणि त्यांना तसंच-तिथंच ठेवणं वाचकांच्याही हिताचं आहे, म्हणून एरवी ‘ब्लॉगार्क’ कविताबिवितांना दूरच ठेवणार; पण सॅन होजेला राहणारे ज्येष्ठ आंबाप्रेमी गद्य- ब्लॉगर श्रीकृष्ण सामंत यांनाही ‘लपविलास तू हापूस आंबा सुगंध त्याचा लपेल का? बाठा चोखून खपेल का?’ अशा बिडंबन-ओळी सुचाव्यात इतकी गोडी हापूसमध्ये आहे. (http://shrikrishnas.blogspot.com/2008/03/blog-post_06.html आणिhttp://shrikrishnasamant.wordpress.com/2009/10/30/) सामंतकाका मूळचे गोंयकार, त्यामुळे वाचनीय लिखाणात जरा गोव्याचा उल्लेख असेल तर त्यांना स्वान्तसुख मिळत असावं! हापूसचे गोडवे गाणा-या किमान तीन नोंदी दोन ब्लॉगांवर करणा-या सामंतकाकांच्या आंबेआठवणींचा एक कप्पा गोव्यातच आहे ‘माडकूर आंब्यात जरी हापूसच्या आंब्याचे सर्व गूण नसले तरी पिकलेल्या आंब्याचा बाहेरून दिसणारा केशरी रंग, आणि त्याचा जास्त गोलट आकार,पाहून आकर्शीत व्हायला होतं.आणि चव विचाराल तर अगदी स्वर्गातलं अमृत मागे पडेल.’ असं ते अगदी ओघानं - जोगीण झालेल्या ज्यूलीच्या गोष्टीत- लिहून जातात. आणखी एक गोमंतकीय मराठी ब्लॉगर गौतम सोमण लिहितात , ‘‘आंब्यांमधील बेताज बादशहा म्हणजे हापूस. मला स्वत:ला मात्र हापूस-इतकाच आमच्या गोव्याचा मानकुराद आंबाही तेव्हढाच प्रिय आहे. शिवाय,घरचं झाड असल्याने मनसोक्त खायची सोय! ’’ (http://gsnapshots.blogspot.com/2010/05/mango-delight.html)
हापूसच, आणि तोही देवगड/ रत्नागिरीचाच, या प्रौढीला थोडा छेद देणारं, कदाचित आंब्यांतल्या जातिव्यवस्थेला आव्हान देणारं काहीतरी ‘असा आहे आडिवरेचा परिसर’ या अवीट बागले यांच्या नोंदीत सापडतं. ‘‘सरकारने फलोत्पादनाला शंभर टक्के अनुदानाची योजना राबविली आणि कातळावर आंब्याच्या बागा उभ्या राहिल्या आहेत. त्या आंब्यालाही वेगळीच चव असते. त्यामुळे रत्नागिरी, देवगड हापूस मागोमाग आडिवरे हापूस प्रसिद्ध झाला तर आश्चर्य वाटायला नको.’’ असं ते लिहितात.. त्याची शहानिशा अर्थातच व्हायची आहे. (http://avitbagle.blogspot.com/2011/04/blog-post_21.html)
हे सदर नुसत्या गप्पांचं नाही आणि इथं ब्लॉग-नोंदींबद्दल पॉझिटिव्ह मतप्रदर्शन केलं जातंच, पण काहीवेळा काही नोंदींना दाद देण्याचा मोह होतो तेव्हा आपण ब्लॉग या सार्वत्रिक माध्यमालाच खरी दाद देताहोत, याचीही जाणीव होते.. ‘‘कित्येक वेळा हापूस म्हणून मद्रास / बंगलोरचा टुकार आंबा घेऊन आलो आहे. मग नंतर आंब्याच्या पेटीतील पेपर पाहून कोकणातला आहे की नाही हे पाहू लागलो. कोणाला माहीत? हे विक्रेते कोकणातून रद्दी आणून त्यात मद्रासचा आंबा पॅक करतही असतील.’’ हे असं स्वच्छ, आत्मीय आणि खुसखुशीत लिखाण- ब्लॉगांशिवाय कुठे वाचता येतं हल्ली? (माहितीसाठी : हेही वाक्य निरंजन क-हाडेंचंच)
आंबा पिकणार आहेच यंदाही, सोबत ब्लॉगही फुलणारच आहेत. त्यामुळे ‘ब्लॉगार्क’मध्ये आंब्याबद्दलचं लिखाण एकाच भागात संपवू नये, असं वाटतंय.. अनेक चांगले ब्लॉगर जसे भाग पाडून, लहान-लहान नोंदी लिहितात, तसं आपण लिहावं,असा विचार इथं आहे. कुणी म्हणेल या सदराचं नाव ‘ब्लॉगार्क’ आहे की ‘ब्लॉगांबा’? .. म्हणू देत!
No comments:
Post a Comment